Jivant 7 12 Mohim Phase 2 Maharashtra Farmers Relief : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनीविषयक अडचणी दूर करण्यासाठी ‘जिवंत ७/१२’ मोहिमेचा दुसरा टप्पा अधिकृतपणे सुरू केला आहे. महसूल विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यभरात जुन्या आणि कालबाह्य नोंदी हटवून सातबारा उतारे अद्ययावत करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणे, जमीन व्यवहार तसेच शासकीय योजनांच्या लाभप्राप्तीत येणाऱ्या अडथळ्यांतून मोठा दिलासा मिळणार आहे.
या मोहिमेअंतर्गत अपाक शेरा, तगाई कर्ज, सावकारी कर्ज, नजर गहाण, बिनशेती आदेश, पोटखराब क्षेत्र, महिला वारस नोंदी आणि इतर कालबाह्य नोंदी हटवून सातबारा उतारे ‘जिवंत’ आणि अद्ययावत केले जाणार आहेत. यामुळे जमिनीचे स्वामित्व स्पष्ट होईल आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या नोंदी अधिक पारदर्शक होतील.
‘जिवंत ७/१२’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात मुंबई येथून करण्यात आली असून, यामध्ये तालुका व मंडळ स्तरावर विशेष कॅम्प आयोजित केले जात आहेत. तलाठ्यांना फेरफार नोंदी घेऊन जुन्या नोंदी हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी या मोहिमेच्या देखरेखीची जबाबदारी पार पाडणार आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मोहिमेचा उल्लेख “शेतकऱ्यांच्या रोजच्या अडचणी दूर करणारा मैलाचा टप्पा” असा केला आहे. या मोहिमेमुळे वारस नोंदी, भोगवट्याचे प्रकार, स्मशानभूमी व सार्वजनिक जागांची नोंद अधिकार अभिलेखात समाविष्ट होणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 “लाडकी बहिण” योजनेअंतर्गत सन्मान निधी ट्रान्सफर प्रक्रिया सुरू; ‘बँक सिडिंग स्टेटस’ तपासणे का गरजेचे.